चीनचा सीमा कायदा नवीन वर्षापासून लागू; भारतासोबतच्या संबंधांवर परिणाम होणार का ?

 चीनचा नवीन सीमा कायदा १ जानेवारीपासून लागू झाला आहे. शेजारील देशाने गेल्या वर्षीच त्याला मान्यता दिली होती. पूर्व लडाखमध्ये भारतासोबत तणावाची परिस्थिती असताना चीनने हा कायदा लागू केला आहे. दरम्यान, चीनने अरुणाचल प्रदेशातील अनेक भागांचे नामांतर केले असून, चिनी राजदूताने भारतातील अनेक नेत्यांना देशात राहणाऱ्या तिबेटी समुदायाच्या लोकांच्या कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही देशांमधील या तणावाच्या काळात चीनच्या या नव्या कायद्याचा संबंधांवर काय परिणाम होणार आहे.

चीनचा नवीन सीमा कायदा काय आहे?

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने हा कायदा मंजूर केला आहे. यामध्ये चीनच्या भूमी सीमेचे रक्षण करणे आणि त्यावरील अतिक्रमण रोखण्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, कायद्यानुसार, “चीनची अखंडता आणि सार्वभौमत्व पवित्र आणि अपरिहार्य आहे. कोणीही अतिक्रमण करू नये, यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकारने सीमा सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक विकास हाती घेणे आवश्यक आहे,” असे कायद्यात नमूद केले आहे. याशिवाय पायाभूत सुविधा मजबूत करणे, सीमेवरील लोकांचे जीवन सुसह्य करणे आणि नागरी वस्ती वसवणे आवश्यक आहे, असे या कायद्यात म्हटले आहे.

चीनने हा नवा कायदा का केला?

वॉशिंग्टनमधील ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटच्या चायना सेंटरमधून डॉक्टरेट करत असलेल्या शुक्सियन लुओ यांनी नोव्हेंबरमध्ये याचा भारताशी संबंधांवर परिणाम होईल असे म्हटले होते. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये सीमेच्या मुद्द्यावरून तणावाची परिस्थिती आहे. यामुळे चीनला आपल्या ताब्यातील भागात परिस्थिती मजबूत करायची आहे, असे लुओ यांनी म्हटले होते. इतकंच नाही तर मध्य आशियाला लागून असलेल्या सीमेबाबतही चीनला काळजी वाटत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबान अनियंत्रित झाले असून त्यांच्या भागात घुसखोरी, दहशतवाद यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, असे वाटते. याशिवाय देशांतर्गत राजकारणात आपली प्रतिमा मजबूत करण्यासाठी शी जिनपिंग यांनी असे पाऊल उचलले आहे.

चीनचा नवा कायदा भारतासाठी चिंतेचा विषय?

चीनने लागू केलेल्या नव्या कायद्यात भारताचा उल्लेख नाही, पण त्याचा परिणाम नक्कीच होईल. चीन आणि भारताची ३,४८८ किमी लांबीची सीमा आहे आणि त्यावरून वाद आहे. चीनला २२,४५७ किमी लांबीच्या सीमा आहेत आणि त्या १४ देशांशी सामायिक आहेत. भारताव्यतिरिक्त चीनची ४७७ किमीची सीमा भूतानशी आहे आणि त्यावरून वाद आहेत. चीनच्या या नव्या कायद्याबाबत ही शंका उपस्थित केली जात आहे की, पूर्व लडाखमधील वाद सोडवण्यासाठी तो आता चर्चेच्या मार्गाबाहेर जाऊ शकतो. ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांच्या कॉर्स कमांडर्समध्ये चर्चा झाली होती. तेव्हा भारताने आशा व्यक्त केली होती की चिनी सैन्याने हॉट स्प्रिंग्समधून माघार घेतली होती, पण ती आतापर्यंत झालेली नाही. इतकेच नाही तर या बैठकीनंतर दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले नाही.

भारताच्या चीनसोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल?

या कायद्यामुळे भारत आणि चीनमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे काही परराष्ट्र धोरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काही लोकांचे म्हणणे आहे की, कायद्याऐवजी चीनच्या या कृतीमुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम होईल. सीमेवर चीन आक्रमक झाल्यास त्याचा दोन्ही देशांच्या संबंधांवर नक्कीच परिणाम होईल. पण केवळ कायद्यामुळे असे होण्याची शक्यता नाही.

.

.

.

. आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा, आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. 

.

.

.

.

सोर्स : दै. लोकसत्ता.

Comments